Google search engine
22
MLA Mungantiwar

‘मन की बात’ कार्यक्रम ऐकण्यात बल्लारपूरला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आ. मुनगंटीवार यांचा २६ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त सहभागावर भर

आ.मुनगंटीवार यांनी ब्रिजभूषण पाझारे यांची संयोजक, तर काशी सिंग यांची सहसंयोजक म्हणून केली घोषणा

विसापूर येथे कार्यक्रमाला आ. सुधीर मुनगंटीवार राहणार उपस्थित

चंद्रपूर : देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘मन की बात’ या संवादमालिकेच्या १३० व्या भागाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ऐकण्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राला राज्यात अव्वल स्थान मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवून कार्यकर्त्यांनी मिशन मोडमध्ये काम करावे, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त नागरिकांची उपस्थिती सुनिश्चित करण्याचे निर्देश देत त्यांनी ‘मन की बात’ हा केवळ कार्यक्रम नसून समाजपरिवर्तनाचा प्रभावी संवाद सेतू असल्याचे अधोरेखित केले.

‘मन की बात’ हा कार्यक्रम जगात एकमेवाद्वितीय असून, कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांनी राजकारणविरहित पद्धतीने जनतेशी थेट संवाद साधण्याचा हा अभिनव उपक्रम राबविला नसल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या या कार्यक्रमात स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक परिवर्तन, कला-संस्कृती आदी विषयांवर भर दिला जातो. भारतातील २२ अधिकृत भाषांमध्ये तसेच २९ बोलीभाषांमध्ये या कार्यक्रमाचे भाषांतर होत असल्याने तो सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३६६ बूथ असून, २०२४ च्या आकडेवारीनुसार सुमारे ३ लाख १२ हजार ३५५ नोंदणीकृत मतदार आहेत. मात्र ‘मन की बात’ हा कार्यक्रम मतदारांसोबतच १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्येही सकारात्मक संस्कार घडवण्यासाठी महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त नागरिकांना एकत्र आणून हा कार्यक्रम ऐकविण्याचे नियोजन करावे, तसेच केंद्र शासनाच्या ‘सरल ॲप’वर कार्यक्रम अपलोड करण्यासाठी नियोजनबद्ध टीम तयार करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासाठी बूथ स्तरावर आवश्यक फॉर्म वाटप करून प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी ब्रिजभूषण पाझारे यांची संयोजक म्हणून, तर काशी सिंग यांची सहसंयोजक म्हणून घोषणा आ. मुनगंटीवार यांनी केली. तसेच २६ एप्रिल रोजी विसापूर येथे होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून सहभाग नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

इतिहासातील दांडी यात्रेचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, छोट्या कृतीतूनही मोठे परिवर्तन घडू शकते. प्रत्येक कार्यकर्त्याच्या छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनही मोठे यश साध्य होऊ शकते. सदस्यता अभियानात अव्वल स्थान मिळवल्यानंतर आता ‘मन की बात’ कार्यक्रमातही बल्लारपूरला राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. यावेळी संवाद सेतू कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, संघटन प्रभारी राम लाखिया तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते