आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेदरम्यान चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र रिंग रोड उभारण्याची ठोस मागणी केली.
चंद्रपूरची लोकसंख्या सुमारे ४.७९ लाख असून औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उद्योग आणि कोळसा खाणींमुळे शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांची समस्या गंभीर बनत आहे.

२०२४-२५ मध्ये जवळपास ९०० अपघातांत ४३० नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे ८०० जण जखमी झाले आहेत. नागपूर-चंद्रपूर तसेच बल्लारपूर-राजुरा-तेलंगणा मार्गावरील वाहतूक शहरातून जात असल्याने चेकबोर्डा-मोरवा-बाबूपेठ-जुनोना या मार्गावर चार ते सहा पदरी, स्मार्ट व ग्रीन संकल्पनेवर आधारित रिंग रोड उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.या प्रकल्पासाठी महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून काम हाती घेऊन तीन महिन्यांत डीपीआर तयार करावा, स्वतंत्र कार्यकारी अभियंता नेमावा तसेच मुंबईत लवकर बैठक घेऊन प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली.

यावर उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकल्पाबाबत सकारात्मक असून डीपीआरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत लवकरच बैठक घेऊन राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयातून प्रकल्प पुढे नेण्याचे आश्वासन दिले.





